महात्मा बसवेश्वरांच्या विचारातून विकसित भारताची स्वप्नपूर्ती - कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर
संगमेश्वरमध्ये महात्मा बसवेश्वर यांच्या विचार कार्यावर राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न
सोलापूर : भारतीय ज्ञाणप्रणालीमध्ये महात्मा बसवेश्वर् हे एक महत्वाचे तत्त्वचिंतक आणि समाजसुधारक आहेत. त्यांनी बाराव्या शतकामध्ये केलेले कार्य आणि मांडलेले विचार क्रांतिकारक होते. तत्कालीन समाजातील विषमता, भेदाभेद आणि कर्मकांडाविरुध्द त्यांनी आवाज उठविला. अनुभव मंडपाच्या माध्यामातून क्रांतिकारक कार्य केले. त्याचे विचार स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या आधुनिक मूल्यांवर आधारित होते. त्यामध्ये देशाला सामाजिक, राजकीय आणि आर्थिक दृष्टया सक्षम करण्याचा विचार महत्त्वाचा असून आजच्या काळालाही या विचारांची आवश्यकता आहे. महात्मा बसवेश्वरांच्या विचारातूनच आजचे विकसित भारताचे स्वप्न् पूर्ण होईल. असे विचार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी मांडले.
संगमेश्वर कॉलेज (स्वायत्त) सोलापूर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, महात्मा बसवेश्वर् अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘महात्मा बसवेश्वर यांचे विचार व कार्य’ या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री. धर्मराज काडादी हे होते. याप्रसंगी महात्मा बसवेश्वर अध्यासनाचे प्रमुख डॉ. चंद्रकांत गार्डी, प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा आणि चर्चासत्र समन्वयक डॉ. वसंत कोरे व सह समन्वयक प्रा. विष्णू विटेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
उद्घाटकीय मनोगतामध्ये मा. कुलगुरु डॉ. प्रकाश महानवर यांनी संगमेश्वर् कॉलेजमध्ये महात्मा बसवेश्वरांच्या जीवनकार्य आणि विचारांवर आधारित चर्चासत्र आयोजिक करण्यात आल्याबद्द्ल समाधान व्यक्त् केले. महात्मा बसवेश्वरांचा विचार आजच्या तरुणांनी लक्षात घ्यायला हवा. त्यांनी केलेले कार्य समाजाच्या विकासासाठी दिशादर्शक असून त्यामधून सामान्यांना जगण्याचा नवा मार्ग मिळतो. विशेषत: आधुनिक काळात ज्यापध्दतीने सामाजिक विषमता वाढत आहे. त्याविरुध्द लढण्याचे बळ महात्मा बसवेश्वरांच्या विचारात आहे. त्या विचारांचा अंगीकार प्रत्येक भारतीयाने केल्यास विकसित भारताचे स्वप्नपूर्ती आपण करू शकतो असे विचार मांडले. अध्यक्षीय मनोगतात, श्री. धर्मराज काडादी यांनी संगमेश्वर कॉलेज हे महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचा वारसा जपणारे महाविद्यालय असल्याचे सांगितले. बसवेश्वरांच्या विचारातील स्त्रीपुरुष समानता, सदाचार, श्रमप्रतिष्ठा ही मूल्ये महत्वाची आहेत. या मूल्यांचा अंगीकार केल्यास आपण चांगले जीवन जगू शकतो. अशा चर्चासत्राच्या माध्यमातून बसवेश्वरांच्या विचारांचा जागर होऊन भारताला महासत्ता बनविण्याची वैचारिक उर्जा मिळेल अशी भूमिका त्यांनी मांडली. विशेषत: सोलापूर विद्यापीठामध्ये श्री सिध्दरामेश्वरांच्या नावाने अध्यासन सुरु करून नवे संशोधन करावे. अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
उद्घाटन सत्राची सुरुवात रश्मी मगदूम या विद्यार्थीने सादर केलेल्या बसववचनाने झाली. कार्यक्रमाचे स्वागत प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा यांनी केले. तर प्रास्ताविक समन्वयक् डॉ. वसंत कोरे यांनी केले. राष्ट्रीय चर्चासत्रातून महात्मा बसवेश्वरांचे सामाजिक न्यायाचे कार्य आणि समतेचे तत्त्वज्ञान याचा सखोल अभ्यास करून जनतेपुढे हा विचार मांडण्याची गरज आहे, असे प्रास्ताविकात या चर्चासत्राचे समन्वयक प्रा. डॉ. वसंत कोरे यांनी म्हटले. पाहुण्यांचा परिचय डॉ. आरती दिवटे यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ. पुष्पांजली मेत्री यांनी केले. तर आभार प्रा. संतोष पवार यांनी मानले. या चर्चासत्रात बीजभाषक म्हणून डॉ. स्वाती महाळंक (दुरदर्शन, पुणे) या मार्गदर्शन करताना महिला सक्षमीकरणाबद्दल महात्मा बसवेश्वरांचे विचार या विषयावर मांडणी केली. या सत्राचे अध्यक्षस्थान डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी भूषविले. दुसऱ्या सत्रात महात्मा बसवेश्वरांच्या विचारांची समकालीन प्रस्तुतता या विषयावर जवाहर कला, विज्ञान आणि वाणिज्य् महाविद्यालय, अंदूर येथील डॉ. अनिता मुदकन्ना यांनी प्रभावी मांडणी केली तसेच डॉ. चंद्रकांत कोळीगुड्डे (राणी चेन्नम्मा विद्यापीठ, विजयपुरा) यांनी महात्मा बसवेश्वरांचे बहुआयामी व्य्क्तिमत्त्व् या विषयावर आपले अभ्यासपूर्ण विचार मांडले. या सत्राच्या अध्यक्षस्थानी शासकीय महाविद्यालय, विजयपुरा येथील प्रा. मल्लप्पा कोदनापूर हे उपस्थित होते.
चर्चासत्राचा समारोप पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. लक्ष्मीकांत दामा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या चर्चासत्रात विविध राज्यातील १४५ अभ्यासकांनी सहभाग नोंदविला. चर्चासत्राच्या यशस्वीतेसाठी, उपप्राचार्य डॉ. सुहास पुजारी, डॉ. वंदना पुरोहित, डॉ. एस.एस.पाटील, डॉ. संघप्रकाश दुड्डे, डॉ. दादासाहेब खांडेकर, डॉ. शिवाजी मस्के, डॉ. राजकुमार मोहरकर, डॉ. राजकुमार खिलारे, डॉ. सुहास दहिटणेकर, डॉ. सारीपुत्र तुपेरे, डॉ. सुनिता सरवदे, डॉ. शिला रामपुरे, डॉ. पी.पी. राजगुरू, मोहन काळे, वैजनाथ स्वामी, चिदानंद स्वामी यांनी विशेष परिश्रम घेतले.


























टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा